शनिवार, २० जून, २०१५

शहरातून '' पाणपोई '' संस्कृतीच होतीये हद्दपार

भरउन्हात पाण्यासाठी पादचाऱ्यांची वणवण ; स्वयंसेवी संस्थाही संवेदनाहीन

श्रीकांत बोरावके
 
                    कडाक्याचा उन्हाळा,डोक्यावर रणरणत ऊन असतांना भर दुपारी शहरातील रस्त्यावर फिरलात तर घोटभर पाणी हि विकत घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते कारण शहरातून पाणपोईच गायब झाली आहे.पूर्वी प्रमाणे स्वयंसेवी संस्थाही पाणपोई उभारतांना दिसत नाही.
                         उन्हाळा आला म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आजकाल साद घालताना दिसत आहेत. सरकारी यंत्रणाही यासाठी सरसावल्या आहेत. परंतु, माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी असणारी आवश्यक सोय मात्र कमी झालेली दिसते आहे.
                          पाणी पाजणे हे पुण्याचे कार्य म्हणून अनेक व्यक्ती व  स्वयंसेवी संस्था पूर्वी अशा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय करायच्या. परंतु, आजकाल या संस्था याबाबतीत उदासिन दिसून येत आहेत.त्यांच्या या उदासीनतेचा लाभ मिनरल वॉटर विकनारयांना होत असून आता रस्तोरस्ती त्यांनी दुकाने थाटलेली दिसत आहे.यासाठी तहानलेल्या जीवांना आता घशाची कोरड भागविण्यास पंधरा ते वीस रुपये मोजावे लागत आहे.उद्योग नगरीत काम करणाऱ्या कष्टकरयाला तहान भागविण्यासाठी विकतचे पाणी घेणे कितपत परवडणारे आहे.?हा प्रश्न उपस्थित होतो.शहरात फेरफटका मारला की, फार तुरळक प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या सोई दिसून येतात.
                           ''पाणी हेच जीवन'' ,''पाण्याचे काम पुण्याचे काम'' असे जरी म्हटले जात असले तरी आज पिण्याच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईने उद्योग नगरीतील सामान्य,कष्टकरी नागरिक हवालदिल होत आहेत. पिण्याचा पाण्यासाठी नागरिकांची भटंकती होऊ नये म्हणून शहरातील रस्त्यावर पाणपोई लावल्याचे चित्र आधी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. मात्र, आता याची संख्या कमी झाली आहे का ? कि वाटसरूस पाणी पाजण्याची आपली संस्कृतीच नामशेष होत आहे ? असा प्रश्न  निर्माण झाला आहे. स्वयंसेवी संस्था,तरुण मंडळे तसेच पालिकेने यासाठी पुढाकार घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशीही मागणी होताना दिसून येत आहे.



पक्षांना पाणी ; माणसाचे काय  
आज रस्त्यावर फिरत असतांना एकाही ठिकाणी पाणपोई दिसत नाही.आजची तरुण पिढी पक्षांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेताना दिसते.परंतु भर उन्हात रस्त्याने चालेल्या वाटसरूबाबत त्यांच्या संवेदना का जाग्या होत नाही.
:-  तुकाराम कांबळे,जेष्ठ नागरिक





 ( पूर्व प्रसिद्धी पुढारी - पिंपरी ०८मे २०१५ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा