मंगळवार, १९ मे, २०१५

राजगुरू स्मारकाची उपेक्षा संपणार तरी केंव्हा …!


                   देश स्वातंत्र्य होऊन आज साठी उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही असे वाटावे असेच चित्र सद्या खेड तालुक्यात आहे.२३ मार्च १९३१ रोजी आपले सहकारी भगतसिंग,सुखदेव यांचा सह देशासाठी फासावर जाणाऱ्या शिवराम हरी राजगुरुंची हि जन्मभूमी.२३ मार्च च्या त्या शांत आणि काळवंडलेल्या सायंकाळी हा क्रांतिवीर देशासाठी हुतात्मा झाला परंतु त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशमान सकाळ कधीच उगवली नाही. असेच म्हणावे लागेल.कारण त्याचा नावाने प्रमाणित करण्यात आलेल्या राजगुरुनगर तालुक्यात त्यांचेच स्मारक निधी,आणि भ्रष्ठाचार यांच्या गर्दीत गुरफटले आहे.
                   अजूनही त्यांच्या स्मारकाचे सुमारे नवद्द टक्के काम बाकी असून या बाबत कसलाच पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. जी उभारले आहे त्यात ही निकृष्ठ दर्जा आहे गेल्याच पावसाळ्यात वाड्यातील अंतर्गत जमीन खचली होती.संरक्षक भिंतीचे काम हि अपूर्ण आहे .राजगुरूंचा पुतळा हि मेघडंबरी विनाच उभा आहे तो हि एवढ्या मोठ्या नगरीत दिसून न येण्या इतका अगदी कापसाच्या गादीत सुई ठेवल्या सारखा. 
                  जमिनींचे वाढते दर,औद्योगिक वसाहती ,खेड शेज,या आणि अशा विविध कारणांतून प्रसिद्धीत असलेल्या खेड तालुक्यात आणि राजगुरुनगर मध्ये हुतात्मा राजगुरूंचा केवळ दीड ते दोन फुटांचा अर्ध पुतळाच असणे हि अत्यंत खेदाची बाब आहे. दुसरीकडे तालुक्यात इतर महापुरुषांचे पुतळे अत्यंत आकर्षक आणि थाटामाटात उभे असून राजगुरुंच्याच पुतळ्याची आणि स्मारकाची अशी उपेक्षा का असा प्रश्न उपस्थित होतो.
                    त्यांच्या हुतात्मा दिनीच सर्वांना पुतळ्याची आणि स्मारकाची आठवण येईल मग पुन्हा विचारांचा जागर होईल. आश्वासनांची खैरात होईल आणि पुन्हा सगळ शांत हि… ! हि गेल्या कित्येक वर्षांची कैफियत आहे ती  बद्दलायला हवी तरच स्मारकाची आणि खऱ्या अर्थाने राजगुरूंची उपेक्षा थांबेल अन्यथा या देशा वर पुढे जीव द्यायला आणि देशा साठी जीव घ्यायला माणस उभी राहणार नाहीत अशी  हि शक्यता नाकारता येत नाही.

कोण्या एका कवीची ओळ या वेळी अधोरेखित करावीशी वाटते 


"सरणावरती आज आमची पेटताच प्रेते 
उठतील या ज्वालान मधुनी भावी क्रांतीचे नेते. 
लोह दंड तव पाया मधले खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार 
गर्जा जय जय कार क्रांतीचा गरजा जय जय कार "

वरील कवितेचा भावार्थ पाहता खरच त्यांचा हुतात्म्याला खरी श्रद्धांजली ना तुम्ही आम्ही देऊ  शकलो ना राज्यशासन ना भारत सरकार देऊ शकले त्यांच्या स्मृती अजूनही तशाच आहेत उपेक्षितच … हि उपेक्षा संपवण्यासाठी स्थानिक तरुण प्राणपणाने प्रयत्न करतायेत हिच जमेची बाजू . नाही तर बाकी सगळी नाणी खोटीच असेच म्हणावे लागेल .
 
:-  श्रीकांत बोरावके.

( प्रसिद्धी दैनिक जनप्रवास,पुणे २२-०३-२०१४ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा